महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने जाणून घ्या महाराष्ट्र राज्याची काही मानचिन्हे..
राकट देशा, कणखर देशा, दगडाच्या देशा अशी आपल्या महाराष्ट्र राज्याची ओळख आहे. या भूमीला उज्ज्वल असा इतिहास आहे. 1 मे 1960 रोजी राजभवन येथे झालेल्या समारंभात महाराष्ट्र राज्याची घोषणा करण्यात आली. आपला जन्म या राज्यात झाला याचा आपल्या सर्वांनाच खूप अभिमान वाटतो. पण तुम्हाला आपल्या राज्याची मानचिन्हे माहित आहेत का? चला तर मग जाणून घेऊया महाराष्ट्र राज्याची काही मानचिन्हे.
महाराष्ट्र राज्याचा राज्य पक्षी म्हणून हरियाल हा पक्षी ओळखला जातो. हा पक्षी कबुतराच्या वंशातील असून त्याला ‘येलो फुटेड ग्रीन पिजॉन’ असे देखील म्हटले जाते. साधारणपणे हा पक्षी भारत, चीन आणि पूर्व आशिया खंडात आढळतो. विशेष म्हणजे हरीयाल आपले पाय जमिनीवर कधीच ठेवत नाही.
उन्हाळात आंबा म्हटले कि आपसूक आपल्या तोंडाला पाणी सुटते आणि हाच आंबा आपल्या राज्याचा राज्य फळ आहे. तुम्हाला माहित आहे का त्याचे शास्त्रीय नाव मॅजिफेरा इंडिका असे आहे. आंब्याच्या अनेक जाती महाराष्ट्र राज्यात आढळतात.
खारीच्या कुळातील असलेला आणि लाजाळू खार म्हणून ओळखला जाणारा प्राणी म्हणजे ‘शेकरू’ आणि हा आपल्या राज्याचा राज्य प्राणी म्हणून ओळखला जातो. शेकरू या प्राण्याचे ‘राटूफा इंडिका’ असे प्राणीशास्त्रीय नाव आहे. या प्राण्याची लांबी 3 फूट लांब असून त्याचे वजन 2 ते 3 किलो असते.
‘ब्लु मॉरमॉन फुलपाखरू हे महाराष्ट्र राज्याचे राज्य फुलपाखरू आहे. या फुलपाखरूला राणी पाकोळी असे देखील म्हटले जाते. प्रामुख्याने हे फुलपाखरू भारताच्या पश्चिम घाट परिसरात आढळते. 2015 साली या फुलपाखराला राज्य फुलपाखरू म्हणून दर्जा देण्यात आला आणि असे घोषित करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे.