व्याजावर पैसे घेऊन मुलाला शिकवले, मुलाने बारावीत एका विषयात केवळ 17 गुण मिळवले! मग वडिलांनी..
अभ्यास करायचा म्हटले की प्रत्येक मुलांच्या कपाळावर आटी येते. सध्या तर मुलं रात्रंदिवस फोन, गे’म्स तसेच मस्ती करण्यात इतके व्यस्त झालेले असतात की त्यांना अभ्यास करण्यात अजिबात रस नसतो आणि याचे परिणाम त्यांच्या रिझल्ट्स वर दिसून येतात. ते परीक्षेत एकततर नापास तरी होतात किंवा त्यांना चांगले गुण मिळत नाहीत. आज आपण अशाच एका मुलाची कहाणी पाहणार आहोत.
अमरेली मधील मोटा अंकडिया या गावात राहणारे कनुभाई सेंजानी यांचा मुलगा हार्दिक याला त्याच्या वडिलांनी उत्तम शिक्षणासाठी व्याजावर पैसे घेतले होते आणि त्या पैशातून त्यांना राजकोट मधील एका स्वयंसहाय्यता शाळेत पाठवले होते.
हार्दिक अभ्यासत बरा असल्याने त्याने सायन्सला प्रवेश घेतला होता. पुढे हार्दिकचा बारावीचा सायन्सचा निकाल लागला त्यात आश्चर्य म्हणजे त्याला भौतिकशास्त्रात केवळ 17 गुण मिळून तो नापास झाला होता. इतर विषयांमध्येही त्याला चांगले गुण मिळाले नव्हते.
ही बातमी समजल्यानंतर कोणत्याही वडिलांना राग येणे स्वाभाविकच आहे आणि इथे तर हार्दिकच्या वडीलांनी व्याजावर पैसे घेऊन मुलाला शिक्षणासाठी चांगल्या ठिकाणी प्रवेश घेवून दिला होता. परंतु, हार्दिकचे मन खचू नये म्हणून त्याचे वडील त्याच्यावर रागवले नाहीत. उलट त्याला धीर देत ते म्हणाले की, ‘बाळा, तू काळजी करू नकोस, ज्या विषयात तू नापास झाला आहेस, त्याचा पुन्हा अभ्यास कर आणि तो विषय सोडव.”
वडिलांचे हे बोलणे ऐकून हार्दिकला खूप आधार वाटला. त्याने चांगला अभ्यास करून दुसऱ्यांदा परीक्षा देऊन ती परीक्षा उत्तीर्ण केली. पुढे हार्दिकने B.Sc. केमिस्ट्री करण्याचा निर्णय घेतला. त्याने प्रवेश घेतला खरा पण B.Sc चा अभ्यास इंग्रजीत असल्याने त्याला तो फारसा समजत नव्हता.
सगळा अभ्यासक्रम त्याच्या डोक्यावरून जात होता. यामुळे तो पहिल्याच सेमिस्टरमध्ये असलेल्या 4 विषयांपैकी 3 विषयात नापास झाला. त्यांनतर तो दुसऱ्या सेमिस्टरमध्येही 3 विषयात नापास झाला. एवढेच नाही तर तो तिसऱ्या सेमिस्टरमध्ये देखील 3 विषयात नापास झाला.
मुलाचे हे अपयश पाहून वडीलांना खूप वाईट वाटत होते. हार्दिकला अभ्यासाची आवड निर्माण व्हावी म्हणून त्यांनी एक युक्ती केली. त्यांनी हार्दिकला एके दिवशी आपल्याजवळ बसवले आणि त्याला सांगितले की, “जर तुला अभ्यास करायचा नसेल तर तू सरळ शेती करावीस.”
वडीलांच्या या बोलण्यानंतर हार्दिकने शेती करण्याचा निर्णय घेतला आणि तो पूर्णवेळ शेतात काम करू लागला. यादरम्यान अवघ्या काही दिवसातच त्याला जाणीव झाली की, शेती करण्यापेक्षा अभ्यास करणे सोपे आहे.
वडिलांच्या या कल्पनेचा त्याच्यावर चांगलाच परिणाम झाला. त्याने वडीलांना शेती न करता अभ्यास करतो असे सांगितले. यांनतर हार्दिकने अगदी मन लावून अभ्यास करण्याचे ठरवले. त्याने जोमाने अभ्यासला सुरुवात केली आणि आश्चर्य म्हणजे तो चौथ्या सेमीस्टरमध्ये सर्व विषयांत उत्तीर्ण तर झालाच मात्र त्याबरोबरीने तो मागील वर्षांत ज्या विषयात नापास झाला होता त्यात देखील तो उत्तीर्ण झाला.
त्याची अभ्यासातील आवड पाहून त्याच्या वडिलांना खूप आनंद झाला. हार्दिकचीही अभ्यासातील आवड चांगलीच वाढली होती. तो मन लावून अभ्यास करू लागला होता. त्याने पाचव्या सेमिस्टरमध्ये प.प्र.मुखस्वामी महाराजांच्या संस्थेतर्फे प्रकाशित झालेले मासिक ‘स्वामिनारायण प्रकाश’ यामध्ये ‘आदर्श विद्यार्थी कसे व्हावे?’ या विषयावर लेख वाचला होता. त्यामुळे त्याला विशेष प्रेरणा मिळाली होती.
याचा परिणाम म्हणजे हार्दिक पाचव्या सेमिस्टरमध्ये कॉलेजमध्ये रसायनशास्त्र विषयात दुसरा आला होता. यामुळे त्याची अभ्यासाप्रती आवड आणखी दृढ होत गेली आणि त्याचा आत्मविश्वासही वाढला. त्यामुळे हार्दिक कॉलेजच्या शेवटच्या वर्षात रसायनशास्त्रात डिस्टिंक्शन मिळवून पहिला आला.
यांनतरही त्याने आपला अभ्यास थांबवला नाही. त्याने पुढे एम.एस्सीला प्रवेश घ्यायचे ठरवले. यासाठी त्याने चार ठिकाणी अर्ज ही केले होते. विशेष म्हणजे 12वीत नापास झालेल्या या मुलाचा आताचा रिझल्ट पाहून त्याला सगळ्याच ठिकाणी प्रवेश मिळाला होता.
पुढे त्याला कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये उत्तम नोकरीची संधी देखील मिळाली होती. मात्र, हार्दिकला पुढे अजून शिक्षण घ्यायचे होते म्हणून त्याने सौराष्ट्र विद्यापीठाची पीएच.डी. प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करून पीएच.डी.चा अभ्यास सुरू केला. यादरम्यान त्याला ओएनजीसी या सरकारी कंपनीमध्ये चांगल्या पगाराची नोकरी मिळाली. त्याने ही नोकरी स्वीकारून अभ्यासही सुरूच ठेवला होता.
आता हार्दिकने नुकतेच पीएच.डी. चे शिक्षण पूर्ण केले आहे. यावरून आपण विचार करू शकतो की, आपल्याला कमी गुण मिळाले अथवा आपण नापास झालो असलो तरीही आपण जिद्दीने आणि आत्मविश्वासाने सर्वकाही साध्य करू शकतो. हे सिद्ध करून दाखवणारा हार्दिक हा आपल्या सर्वांसाठी एक उत्तम उदाहरण बनला आहे.