एकेकाळी भाजीपाला विकून उदरनिर्वाह केला, आज मेहनत करून उभी केली 500 कोटींची कंपनी..
जर तुमच्या जीवनात गरिबी असेल तर तिच्यासमोर हतबल होऊ नका. उलट हीच संधी असते काहीतरी करून दाखवायची. कारण ज्यांना लोक सुरवातीला येड्यात काढतात तेच लोक नंतर पुस्तकांच्या धड्यात सापडतात. स्वतः विश्वास असले तर माणूस जगाला हरवू शकतो.
गरिबीच माणसाला पुढे जाण्यासाठी स्वप्न दाखवते आणि एकदा आपले ध्येय आपल्याला कळले की आपली पाऊले आपोआप त्या दिशेने चालू लागतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका व्यक्तीबद्दल सांगणार आहोत ज्यांनी अशा गरिबीचा सामना करून आपले यश संपादन केले.
एकेकाळी भाजीपाला विकणारा व्यक्ती आज तब्बल 500 कोटींच्या कंपनीचा मालक बनला आहे. त्यांचा हा प्रवास आपल्या सर्वांना प्रेरणा देणारा आहे. चला तर जाणुन घेऊया त्यांच्या या जीवन प्रवासाबद्दल!
नितीन गोडसे यांचा जन्म अहमदनगर येथील एका छोट्या गावात गरीब कुटूंबात झाला. घरची परिस्थिती हलाखीच होती. वडील एका खासगी कंपनीत तुटपुंज्या पगारात काम करत होते. तसेच नितीन यांना 2 भावंडं, यामुळे कुटूंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण झाले होते. यामुळे नितीन यांनी देखील एका कंपनीत सेल्समनची नोकरी स्वीकारली.
काम करत त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले आणि 1992 साली पुणे विद्यापीठातून BSC ची पदवी मिळवली. पुढे त्यांनी आपले MBA देखील पूर्ण केले. यानंतर त्यांना एका कृषी कंपनीत नोकरी मिळाली. येथे आल्यानंतर त्यांनी येथील व्यवसाय जाणून घेतला आणि स्वतःच्या भाजीपाला व्यवसाय सुरू करण्याचा त्यांनी निर्णय घेतला.
त्यांनी मित्रांकडून पैसे उसने घेऊन भाजीपाला विकायला सुरवात केली, मात्र त्यांना यात जास्त नफा मिळत नव्हता. यामुळे त्यांना हा व्यवसाय बंद करावा लागला. नंतर त्यांनी एका गॅस कंपनीत मार्केटिंग मॅनेजर म्हणून नोकरी केली. इकडे 3 वर्षे काम करून त्यांनी निधी उभारला.
जमवलेल्या पैशातून त्यांनी 1996 मध्ये स्वतःची गॅस हाताळणी यंत्रणा आणि गॅस कॅबिनेट बनवणारी कंपनी सुरू केली. त्यांच्या या कंपनीचे नाव होते ‘एक्सेल गॅस अँड अप्लायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड’. आज त्यांच्या कंपनीची उलाढाल जवळपास 500 कोटींच्या आसपास आहे.