कल्याणच्या मुलाचा महाराष्ट्रात डंका! MPSC RTO परिक्षेत आला राज्यात प्रथम..
दरवर्षी लाखो विद्यार्थी एमपीएससी परीक्षा देत असतात. मात्र, यापैकी काही मोजक्याच विद्यार्थांना यश मिळते. वर्षभर अभ्यास करून काही विद्यार्थ्यांना यात अपयश मिळते, तर काही जण कठोर परिश्रमाने हे यश संपादन करतात. आज आपण अशाच एका तरुणाची कहाणी जाणून घेणार आहोत. ज्याने कठोर परिश्रमाने एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली आहे.
कल्याण पश्चिम येथील वालधुनी परिसरातील रहिवासी असलेले भास्कर सालेकर आणि श्रध्दा सालेकर यांचा मुलगा अभिषेक सालेकर याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या सहायक मोटार वाहन निरीक्षक या मुख्य परीक्षेमध्ये राज्यातून प्रथम क्रमांक पटकावला आहे. यामुळे त्याच्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.
भास्कर सालेकर आणि श्रध्दा सालेकर ये दोघे ही पेशाने शिक्षक आहेत. भास्कर सालेकर हे मुंबई महापालिकेच्या शाळेत शिक्षक आहेत. तर श्रध्दा सालेकर ह्या कल्याण मधील खाजगी शाळेत शिक्षिका आहेत. आईवडिल दोघेही शिक्षक असल्यामुळे अभिषेक यांना लहानपापासूनच अभ्यासाची आवड आहे. अभिषेक हा पहिल्यापासूनच अभ्यासात प्रचंड हुशार आहे.
अभिषेकने कल्याण पश्चिमेतील सुभेदारावाडा शाळेत दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. दहावीच्या परीक्षेत त्याने 96 टक्के गुण मिळवत शाळेत प्रथम क्रमांक पटकावला होता. त्यांनतर अभिषेकने आपले बारावीपर्यंतचे शिक्षण बी. के. बिर्ला महाविद्यालयामध्ये विज्ञान शाखेतून पूर्ण केले.
पुढे अभिषेकने नाशिक येथील के. के. वाघ इंजिनीअरिंग महाविद्यालयात बी.ई.मेकॅनिकलचे पदवी शिक्षण घेतले. अभिषेकला लहानपणापासूनच त्याचे आजोबा मुकुंद दामले यांच्याकडे पाहून आपणही सरकारी अधिकारी व्हावे अशी त्याची इच्छा होती. त्याचे आजोबा मुकुंद हे बीएआरसीमध्ये उच्चपदावर कार्यरत होते. त्यामुळे आपणही सरकारी अधिकारी होऊन लोकांची सेवा करावी अशी त्याची इच्छा होती. यासाठी त्याने स्पर्धा परीक्षांची तयारी सुरु करण्याचा निर्णय घेतला.
अभिषेकने मॅकेनिकलपर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर एमपीएससी स्पर्धा परीक्षेच्या तयारीला सुरुवात केली. परीक्षेच्या अभ्यासाठी अभिषेक एक वर्ष हैदराबादला गेला. त्याने खूप अभ्यास करून मार्च 2020 मध्ये सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदासाठीची पूर्व परीक्षा दिली. मात्र, यानंतर जागतिक सं’क’ट ओढवले आणि यामुळे पूर्व परीक्षेचा निकाल कधी लागणार आणि नंतर मग मुख्य परीक्षा कधी होणार याची काहीच कल्पना नव्हती.
या दरम्यानच्या काळात अभिषेकने अंबरनाथ येथील खासगी कंपनीत काही काळ डिझाईन इंजिनीअर म्हणून नोकरी केली. याबरोबरच अभिषेकने परीक्षेची तयारी सुरूच ठेवली होती. अभिषेकने परिवहन विभागातील सहाय्यक मोटर वाहक निरीक्षक पदासाठी त्याने परीक्षा देण्याचा निर्णय घेतला.
यासाठी त्याने आपली नोकरी सोडली आणि 8 महिने घरी राहून त्याने तयारी करण्यास सुरुवात केली. नोव्हेंबर 2021 मध्ये ही परीक्षा घेण्यात आली होती. त्यावेळेस अभिषेकने जिद्दीने मेहनत करून परीक्षेची तयारी केली. यामधे त्याला त्याचे शिक्षक, आई वडिल यांची साथ आणि मार्गदर्शन देखील मिळत होते.
अखेर अभिषेकच्या वाढदिवसादिवशीच परिक्षेचा निकाल जाहीर झाला. आपण चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणार असा त्याला पूर्ण विश्वास होता. मात्र, अभिषेकने राज्यातून प्रथम क्रमांक मिळवला होता. हे पाहून त्याचा आनंदाला पारावार उरला नव्हता. त्याच्या कुटुंबीयांना देखील आपल्या मुलाचे हे घवघवीत यश पाहून खूप आनंद झाला.
तब्बल पाच हजार मुलांमधून अभिषेकने प्रथम क्रमांक पटकावला आहे याचा त्याला आणि त्याच्या कुटुंबीयांना खूप अभिमान आहे. अभिषेकच्या या घवघवीत यशामुळे कल्याणचा नावलौकिक वाढला आहे. त्याच्या या यशाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. सर्वच स्तरातून त्याचे अभिनंदन केले जात आहे.