ATM मधून 300 रुपये काढत असताना पैसे न येता खात्यातून वजा झाले, पुण्याच्या पठ्ठ्याने RBI नियमानुसार बँकेकडून 9600 रुपये मिळवले
तुमच्या बाबतीत असे कधी घडले आहे का, की तुम्ही पैसे काढायला ATM मध्ये गेला आणि पैसेच बाहेर आले नाहीत परंतु पैसे तुमच्या बँकेतून कट झाल्याचा मेसेज तुम्हाला आला आहे. साहजिकच आहे की अशावेळी माणूस संतापतो आणि बँकेत धाव घेतो.
अशीच एक घटना, पुण्यात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याच्या बाबतीत घडली होती. पुण्यात शिक्षण घेत असणारा श्रीकांत येरुळे हा एके दिवशी बँकेच्या एटीएममधून 300 रुपये काढण्यासाठी गेला. परंतु पैसे तर आलेच नाहीत आणि त्याच्या खात्यातून रक्कम वजा झाली.
यानंतर श्रीकांतने रक्कम परत खात्यात जमा होईल या आशेने दोन दिवस वाट पाहिली परंतुरक्कम काही जमा झाली नाही. यानंतर त्याने बँकेकडे रीतसर लेखी तक्रार केली. परंतु अनेकवेळा चौकशी करूनही त्याला बँकेकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. काही दिवस उलटले आणि जवळपास 4 महिन्यांनी त्याच्या खात्यात 300 रुपये जमा झाले.
यानंतर श्रीकांत त्वरित बँकेत गेला आणि त्याने रिझर्व्ह बँकेचा एटीएम नुकसानभरपाईबाबतचा अध्यादेशही बँकेच्या अधिकाऱ्यांना दाखवला. रिझर्व्ह बँकेने नमूद केलेल्या नियमानुसार ग्राहकाच्या खात्यातून पैसे वजा झाल्यास सात दिवसाच्या आत बँकेला पैसे जमा करणे बंधनकारक असते.
पैसे जर जमा नाही झाले तर प्रतिदिन 100 रूपये दं’ड देखील आकारण्यात येतो. परंतु बँकेच्या अधिकाऱ्यांनी या नियम बदलला असल्याचे सांगितले. परंतु जेव्हा श्रीकांतने वेबसाईट पाहण्याचा आग्रह धरल्यावर “चौकशी करून सांगतो” असे त्याला सांगण्यात आले. तसेच श्रीकांतने याबाबत बँकेकडे लेखी तक्रार देखील केली होती. शेवटी बँकेने 9600 रुपये नुकसानभरपाई म्हणून श्रीकांतच्या खात्यावर जमा केले.