राधिका सोबत लग्न करण्याआधी अजिंक्य रहाणेला घरच्यांनी हा सल्ला दिला होता..
अजिंक्य मधुकर रहाणे हा लोकप्रिय भारतीय क्रिकेटपटू आहे. त्याचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील अश्विकेडी येथे एका मराठी कुटुंबात झाला. अजिंक्यने वयाच्या 7 व्या वर्षी क्रिकेट खेळायला सुरुवात केली, जेव्हा त्याचे वडील त्याला डोंबिवलीमधील कोचिंग कॅम्पमध्ये घेऊन गेले. पण तिथे त्याला योग्य असे प्रशिक्षण मिळाले नाही. त्यानंतर त्याने प्रवीण आमरे माजी भारतीय कसोटी पटू यांच्याकडून वयाच्या 17 वर्षापर्यंत प्रशिक्षण घेतले. अजिंक्यने डोंबिवली येथील एस.व्ही.जोशी हाय स्कूल मधून एस.एस.सी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे.
प्रशिक्षण घेतल्यानंतर त्याने न्यूझीलंडविरुद्ध भारताचे प्रतिनिधित्व करताना एक अंडर-19 सामना खेळला. सप्टेंबर 2007 मध्ये त्याने वयाच्या 19 व्या वर्षी कराची अर्बन विरुद्ध मुंबईसाठी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने त्या सामन्यात 143 धावा केल्या, ज्यामुळे त्याला भारताविरुद्धच्या इराणी ट्रॉफी सामन्यासाठी निवडण्यात आले होते.
त्यांनतर त्याने मुंबईसाठी रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पण केले. त्यात त्याने 1000 हून अधिक धावा केल्या आणि मुंबईला 38 वे रणजी विजेतेपद जिंकून दिले. पुढे इराणी ट्रॉफीमध्ये राजस्थानविरुद्ध 152 धावा केल्यामुळे त्याला भारतीय कसोटी संघात स्थान मिळाले.
अजिंक्य आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स, राजस्थान रॉयल्स आणि रायझिंग पुणे सुपरजायंटकडून खेळला आहे. त्याने आयपीएलमध्ये शतकासह 2000 हून अधिक धावा केल्या आहेत. 2015 मध्ये त्याची ODI आणि T20 क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
2015 मध्ये श्रीलंकेत पहिली टेस्ट खेळताना आठ कॅच पकडून त्याने विश्व विक्रम प्रस्थापित केला आहे. तसेच मार्च 2017 मध्ये विराट कोहली जखमी झाल्यामुळे अजिंक्यने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटीमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले आणि यात भारताने तो सामना आठ गडी राखून जिंकला आणि बॉर्डर-गावस्कर करंडक जिंकला.
अजिंक्य प्रामुख्याने कसोटी स्वरूपात मधल्या फळीतील फलंदाज आहे. तो आयसीसी प्लेयर रँकिंगनुसार नोव्हेंबर 2019 पर्यंत जगातील 7व्या क्रमांकाचा फलंदाज आहे. 2016 मध्ये BCCI कडून रहाणेची अर्जुन आवार्ड साठी शिफारस करण्यात आली.
क्रिकेट क्षेत्रात खूप कमी काळात त्याने खूप प्रसिद्धी मिळवली आहे. त्याच्या या यशात त्याच्या कुटंबीयांचा तसेच त्याच्या पत्नीचा फार मोठा वाटा आहे असे तो नेहमी सांगत असतो. अजिंक्यचे लग्न राधिका धोपवकर हिच्याशी 26 सप्टेंबर 2014 रोजी मुंबईत झाले आहे. त्यांचा प्रेमविवाह आहे. या जोडीची प्रेम कहाणी जुन्या चित्रपटालाही लाजवेल अशीच आहे.
शालेय काळात या दोघांमध्ये प्रेम फुलण्यास सुरुवात झाली होती. दोघे एकाच शाळेत शिकत असून दोघे ही एकमेकांच्या जवळ राहत होते. त्यामुळे त्या दोघांमध्ये घट्ट मैत्री होती. दोघे एकमेकांशी अनेक गोष्टी शेअर करायचे. त्यांनतर हळुहळू या घट्ट मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आणि दोघांनी एकमेकांसोबत विवाह करण्याचा निर्णय घेतला.
ते दोघ एकमेकांसोबत डेट करत असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांना नव्हती. मात्र, ज्यावेळी त्यांच्या कुटंबीयांना समजले तेव्हा त्यांनी विरोधही केला नाही. परंतु, अजिंक्यच्या कुटुंबियाने आधी क्रिकेटर होण्याचे स्वप्न पूर्ण कर आणि मग लग्नाचा विचार कर असा त्याला सल्ला दिला होता.
यादरम्यान राधिकानेही त्याला खूप खंबीर साथ दिली आणि अजिंक्यची कारकिर्द बहरली. यांनतर त्याने 2014 मध्ये राधिकासोबत लग्न केले. आता ते दोघेही आनंदी आयुष्य जगत आहेत. त्यांना 2019 मध्ये एक गोंडस मुलगी झाली तिचे नाव आर्या असे ठेवण्यात आले आहे. तसेच तीन वर्षानंतर मुलीच्या वाढदिवसादिवशीच अजिंक्यला दुसरा मुलगा झाला आहे. या योगायोगामुळे ते खूप आनंदी आहेत. आता अजिंक्य रहाणे पुन्हा एकदा टीम इंडियाकडून खेळताना दिसावा असे, त्याच्या चाहत्यांना वाटत आहे.