भरगच्च पगाराच्या नोकरीला सोडून दाम्पत्याने घेतला शेती करण्याचा निर्णय, आता शेतीतून वर्षाला करत आहेत 1 कोटींची उलाढाल
आजकाल नोकरी मिळवण्यासाठी तरुणपिढी खूप धडपड करताना आपण पाहत आहोत. परंतु आपली असलेली चांगली नोकरी सोडून कोणी शेती करण्याचा निर्णय घेतला तर? असेच काहीसे जोधपूर मधील एका दाम्पत्याने केले आहे. जोधपूरमध्ये राहत असलेले ललित हे एमबीए करून बँकेत नोकरी करत होते आणि त्यांची पत्नी खुशबू या चार्टर्ड अकाउंटंट म्हणून कार्यरत होत्या.
परंतु दोघांनाही यातुन मानसिक समाधान भेटत नव्हते. त्यानंतर अचानक या दाम्पत्याने आपली चांगली नोकरी सोडून शेती करण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्या दोघांनी सेंद्रिय शेती करण्याचा निर्णय घेतला. ललित यांनी सेंद्रिय शेतीबद्दल फक्त ऐकले होते. परंतु याबाबत त्यांना माहिती नव्हती. पुढे त्यांनी शेती करायचा निर्णय घेत्यानंतर त्यांनी सेंद्रिय शेतीवर संपूर्ण संशोधन केले.
पुण्यात शिक्षण घेत असताना त्यांनी ग्री’न हा’ऊ’स आणि पॉलीहाऊसबद्दल ऐकले होते असे त्यांनी सांगितले. तेव्हा त्यांना आपली देखील अशी एक नर्सरी असावी असे वाटले होते. पुढे त्यांनी सगळ्या गोष्टींचा नीट अभ्यास केला. संशोधन केले त्यानंतर त्यांनी त्यांच्या वडिलांकडून वडिलोपार्जित असलेली जमीन मागितली. ललित यांची ही कल्पना आधी त्यांच्या वडिलांना जास्त पटली नव्हती. मात्र, कालांतराने त्यांनीही या गोष्टीस होकार दिला.
त्यांनतर त्यांनी शेतीमध्ये हरितगृह आणि पॉलीहाऊस बांधले आणि रोपवाटिका सुरू केली. तिथे त्यांनी सेंद्रिय फळे आणि भाज्यांची लागवड केली. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी त्यांनी यामध्ये एक लाख रुपये गुंतवले होते. मात्र, आज या दाम्पत्याची वार्षिक उलाढाल 1 कोटींपेक्षा ही अधिक आहे. खुशबू या पेश्याने CA होत्या त्यामुळे सुरुवातीला त्यांच्यासाठी हे सर्व अवघड जात होते.
परंतु हळुहळू त्यांनी यातील सर्व बारकावे शिकून घेतले आणि आता त्या हा सगळा व्यवसाय उत्तमरीत्या सांभाळत आहेत. या दोघांनीही सेंद्रिय शेती करून एक यशस्वी व्यवसाय करून दाखवला आहे. राजस्थानमधील अनेक शेतकऱ्यांना या दाम्पत्याने तयार केलेल्या पॅटर्नचा अवलंब करयचा आहे.
आत्तापर्यंत त्यांनी 60 हजार शेतकऱ्यांना याबद्दल माहिती देऊन शेतीविषयक मार्गदर्शन केले आहे. ते राहत असलेल्या क्षेत्रात पाण्याची टंचाई जास्त प्रमाणात आहे. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये कमी पाण्यात जास्त उत्पादन कसे मिळवता येईल, तसेच कोणते पीक घेतले जाईल आणि सेंद्रिय शेतीमधून पैसे कसे कमवता येतील, अशा अनेक प्रश्नांवर हे दाम्पत्य मार्गदर्शन करीत आहेत.
या भागातील शेतकऱ्यांना शेतीच्या या नवीन कल्पना देऊन त्यांना चांगला नफा मिळवून देण्याचे आमचे उद्दिष्ट आहे असे या दाम्पत्याने सांगितले आहे.
आपल्याकडे मेहनत करण्याची जिद्द असेल तर आपण कोणतेही काम यशस्वी करून दाखवू शकतो, हे या दाम्पत्याच्या उदाहरणावरुन सिद्ध झालेले आहे. त्यांच्या या कार्यामुळे अनेकांसाठी ते प्रेरणास्रोत बनले आहेत.