सलाम तुम्हाला! महाराष्ट्रातील ऋतुजा कुलकर्णी बनल्या देशातील पहिल्या ‘तर्करत्न’
महिलांसाठी सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाची दारे खुली करून तब्बल 174 वर्षे झाली असून यापूर्वी शास्त्र परंपरेची दारे महिलांसाठी बंदच होती. वेदशास्त्र आणि धर्मशास्त्र हे प्राचीन भारताचे पवित्र साहित्य मानले जातात, ज्यांचा जेवढा अभ्यास करेल तेवढा कमीच आहे. 2014 मध्ये गोव्यामधील महामहोध्याय देवदत्त पाटील गुरुजींनी पुढाकार घेतल्यामुळे प्रथमच शास्त्र परंपरेच्या अभ्यासासाठी महिलांना प्रवेश मिळाला होता.
सध्या वेदशास्त्राचे शिक्षण देणाऱ्या संस्था ठिकठिकाणी सुरू झाल्या आहेत. परंतु धर्मशास्त्रांच्या अभ्यासात हवा तेवढा रस घेतला जात नाही. संस्कृत विषयाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना धर्मशास्त्राचा अभ्यासक्रम आहे परंतु तो वरवरचाच आहे.
म्हणूनच गोव्यामधील महामहोध्याय देवदत्त पाटील गुरुजींच्या वेदशाळेने शास्त्र परंपरेच्या अभ्यासासाठी मुलींना संधी प्राप्त करून दिली. श्रूंगेरी मधील जगदगुरू शंकराचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेमध्ये देशभरातील विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. त्यामधील महाराष्ट्रातून ऋतुजा बाळकृष्ण कुलकर्णी ह्या एकमेव होत्या.
श्रूंगेरी पीठाचे जगदगुरू शंकराचार्य विदुशेखर भारती यांच्या उपस्थीतीमध्ये 18 व 19 ऑगस्टला ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती. यात ऋतूजा कुलकर्णी आणि गोव्यातील हर्डीकर या दोघींनी सहा वर्षे रीवान मधील गुरुकुल पद्धतीने श्रीविद्या पाठशाळेत न्यायशास्त्राचा अभ्यास करून सर्वात कठीण समजली जाणारी ही महापरिक्षा उत्तीर्ण केली आहे.
पुढे ऋतुजा कुलकर्णी सांगतात की, एकूण सहा शास्त्र आहेत त्यापैकी न्याय आणि व्याकरण हे शास्त्रच मुलींना शिकता येते. ऋतुजा यांनी कला क्षेत्रात 12 वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करून न्यायशास्त्राचा अभ्यास करण्याचा निश्चय घेतला होता. या सहा वर्षांच्या काळात 22 जुन्या संस्कृत ग्रंथावर आधारित प्रत्येक महिन्याला परीक्षा घेण्यात आली.
“विश्वाची निर्मिती होत असताना ऋषीमुनींनी अनेक ग्रंथ लिहिले आहेत. याच ग्रंथांचा अभ्यास करून तर्कशास्त्राच्या आधारे हे ज्ञान सोप्या भाषेत करून सर्वसामान्यांपर्यंत पोचवणे हेच तर्कशास्त्राचे प्रमुख उ्दिष्ट आहे.”असे ऋतुजा यांनी सांगितले.