लहानपणापासूनच डोंगरावर म्हशी चरायला नेऊन अभ्यास केला, लग्नाला विरोध करत UPSC परीक्षा उत्तीर्ण होऊन बनली IAS अधिकारी!

दरवर्षी लाखो उमेदवार युपीएससीच्या परीक्षेसाठी दिवसरात्र मेहनत घेत असतात. यादरम्यान अनेकांना खूप संघर्ष करावा लागत असतो. यात अनेक विद्यार्थी अत्यंत गरीब परिस्थितीतून पुढे आलेले असतात आणि परीक्षा उत्तीर्ण होऊन अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण करत असतात. यात काही जण लगेच हार मानतात तर काही जण त्याला धैर्याने तोंड देत असतात.

आज आपण या पोस्टच्या माध्यमातून अशाच एका गरीब कुटुंबातील शेतकऱ्याच्या मुलीची कहाणी जाणून घेणार आहोत, जिने घरातील जनावरे डोंगरावर चरायला घेऊन जाऊन देखील अभ्यास केला आणि आपले स्वप्न पूर्ण करून आज ती जिल्हाधिकारी बनली आहे. चला तर मग जाणून घेऊयात या शेतकऱ्याच्या लेकीची कहाणी..

तमिळनाडूमधील इरोड जिल्ह्यातील एका अत्यंत गरीब कुटुबांमध्ये सी.वनमती यांचा जन्म झाला आहे. वनमती यांच्या घरची परिस्थिती अत्यंत गरीब होती. त्यामुळे लहानपणापासूनच शाळेत असताना अभ्यासाबरोबरच त्यांना घरातील कामात हातभार लावावा लागायचा. त्यांचे कुटुंबीय पशुपालन करायचे त्यामुळे वनमती यांना ही यात मदत करायला लागायची. त्या स्वतः डोंगरावर म्हशी चरायला घेऊन जायच्या.

वनमती यांच्या घरची परिस्थिती गरीब असल्याने त्यांनी ही परिस्थिती बदलण्याचे लक्ष्य लहानपणीच आपल्या उराशी बाळगले होते. यामुळे त्यांनी अभ्यास करून मोठे अधिकारी व्हायचे स्वप्न उराशी बाळगून कठोर मेहनत घ्यायला सुरूवात केली होती. यादरम्यान त्या म्हशींना चरायला घेऊन जाताना सोबत पुस्तकं घेऊन जायच्या आणि डोंगरावर जाऊन अभ्यास करत बसायच्या.

अशा प्रकारे घरच्या कामांबरोबरच त्या शिक्षण ही पूर्ण करत गेल्या. मात्र, यादरम्यान बारावीची परीक्षा झाल्यानंतर वनमती यांच्या घरच्यांनी त्यांचे लग्न करण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकला होता. परंतु, वनमती यांचे आयएएस अधिकारी व्हायचे स्वप्न होते. त्यामुळे त्यांनी घरच्यांना समजावून लग्नाला विरोध केला. यावर त्यांच्या कुटुंबियांनी देखील त्यांना चांगली साथ दिली.

वनमती यांनी मुलाखतीमध्ये सांगितलेल्या 2 गोष्टींनी त्यांना प्रेरणा दिली त्या म्हणजे, त्यांच्या गावचे जिल्हाधिकारी ज्यांना पाहून वनमती खूप प्रभावित झाल्या होत्या. तसेच त्यांनी गंगा यमुना सरस्वती या नावाची मालिका पाहिली होती त्यात देखील एक अभिनेत्री आयएएस अधिकारी होती. त्यामुळे त्यांनी आयएएस अधिकारी व्हायचे निश्चित केले होते.

यासाठी त्यांनी संगणक क्षेत्रात पदवी शिक्षण पूर्ण केले. पुढे त्यांनी आपल्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्यासाठी एका खाजगी बँकेत नोकरी केली. यादरम्यान त्यांनी आपला अभ्यास चालूच ठेवला होता. त्या रात्री जागून अभ्यास करायाच्या. मात्र, वनमती यांना युपीएसी परीक्षेत पहील्याच प्रयत्नात अपयश आले. यांनतरही त्यांनी हार मानली नाही.

पहील्याच प्रयत्नांत अपयश आल्यानंतर त्यांनी आणखी जोमाने तयारी सुरू केली आणि जिद्दीने अखेर 2015 मध्ये त्यांनी दुसऱ्यांदा युपीएसी परीक्षेत उत्तीर्ण होऊन आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केले. आज अनेक तरुणांसाठी त्या एक उत्तम उदाहरण बनल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page