लग्नानंतर दोन मुलं झाल्यानंतर “तू सावळी आहेस” असे म्हणून नवऱ्यानं सोडले, आता पहिल्याच प्रयत्नात मिळवली पोलिस दलात नोकरी..
प्रत्येकाच्या जीवनात संघर्ष हा असतोच. मात्र, त्या संघर्षावर मात करण्याची जिद्द जर आपल्यामध्ये असेल तर आपण सहज आपले ध्येय गाठू शकतो. याचाच प्रत्यय देणारी गोष्ट आज आपण पाहणार आहोत. जळगाव जिल्ह्यातील एका गावात कविता साळुंखे यांचा जन्म झाला. कविता यांना दोन मोठ्या बहिणी आणि एक मोठा भाऊ आहे. मोठं कुटूंब असल्यामुळे त्यांचे आईवडिल दोघे ही मोलमजुरी करायचे.
काही कारणास्तव कविता यांना त्यांच्या मावशीकडे ठेवण्यात आले होते. मावशीकडे त्यांनी आपले तिसरी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. मावशीची आर्थिक परिस्थीती चांगली नसल्यामुळे कविता यांच्या आईने त्यांना अनाथ आश्रमामध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला. अ’नाथ आ’श्रमामध्ये कविता यांनी आपले पुढील शिक्षण पूर्ण केले. 2009 साली 12वी मध्ये शिकत असताना कविता यांचा विवाह झाला. कविता यांचा पती औरंगाबाद येथे एका कंपनीमध्ये नोकरीस होते.
त्यांचा संसार सुखाने सुरू होता. त्यांना पुढे दोन अपत्य झाली. पहिला मुलगा झाला आणि नंतर मुलगी. मुलगी झाल्यानंतर काही दिवसांतच कविता यांचा पती त्यांच्याशी तुटकपणे वागू लागला. कविता यांना त्रास देऊ लागला. कविता देखील हा त्रास सहन करत राहिल्या.
एकदा त्या आपल्या दोन मुलांना घेऊन नातेाइकांकडे लग्नसमारंभासाठी गेल्या होत्या. मात्र, घरी परतल्यानंतर पाहिले तर त्यांचा पती दाराला लॉक लावून कुठेतरी निघून गेला होता. यासंबंधीत घर मालकीणीकडे चौकशी केली असता, त्यांचा पती सकाळीच बाहेर गेला असे समजले.
यानंतर कविता यांनी बरेच दिवस आपल्या पतीचा शोध घेतला. त्यांच्याविषयी चौकशी केली. त्यादरम्यान ते आपल्या बहिणीच्या घरी आहेत असे समजल्यानंतर कविता यांनी त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, “तू सा’व’ळी आहेस, म्हणून मला तुझासोबत राहायचे नाही”, असे सांगितले. हे ऐकून कविता पूर्णपणे निराश झाल्या, असे त्या सांगतात.
परंतु आपल्या दोन मुलांकडे बघून त्यांनी स्वतःला सावरले. इथून पुढे आपले सगळे आयुष्य आपल्या मुलांसाठी जगायचे असा त्यांनी निश्चय केला. यादरम्यान त्यांच्या घराचे 2-3 महिन्याचे घर भाडे देखील थकले होते. यासाठी त्यांनी एक रूग्णालयामध्ये काम करण्यास सुरुवात केली.
रूग्णालयात काम करून त्या एकट्या आपल्या मुलांचे शिक्षण आणि घर या दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडत होत्या. पुढे काही दिवसांनी त्या कामावर जात असताना एका रिक्षावर त्यांना स्पर्धा परिक्षेची जाहिरात दिसली. त्यांनी याबाबत विचारणा केली असता त्यांना भेटायला बोलवण्यात आले. तिथे सोनवणे सरांनी कविता यांना स्पर्धा परिक्षेबद्दल मार्गदर्शन केले.
त्यांनी स्पर्धा परिक्षा देण्याचा निश्चय केला आणि त्यांना 2016 मध्ये पहिल्याच प्रयत्नात अवघ्या सहा महिन्यांत पोलीस दलामध्ये नोकरी मिळाली. सध्या कविता या औरंगाबाद मध्ये पोलीस आयुक्तालयामध्ये पोलीस कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहेत. पोलिस दलात लागल्यानंतर त्यांची आर्थिक स्थिती देखील चांगली झाली आहे. त्यांनी आता स्वतःचे घर घेतले आहे आणि आता त्या आपल्या मुलांसोबत आनंदाने जीवन जगत आहेत, असे कविता सांगतात.
कविता यांना आता भविष्यामध्ये स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण करून अधिकारी होण्याचे स्वप्न आहे. त्यासाठी त्यांनी आपले प्रयत्न चालू केलेले आहेत असे त्यांनी सांगितले आहे. अनेक कठीण प्रसंगांवर मात करत कविता यांनी जिद्दीने पोलिस दलात नोकरी मिळवली. याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक केले जाते. त्यांचा हा संघर्ष अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.