पुण्याच्या या पठ्ठयाला आमचा सलाम! छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा जपण्यासाठी बांधले किल्ल्याच्या आकाराचे तब्बल 1 कोटींचे घर
छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या प्रत्येकाचे आराध्य दैवत आहेत. त्यांच्या विचारांचा, त्यांच्या जीवनशैलींचा आपल्या प्रत्येकावर प्रभाव आहे. महाराजांचे विचार एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला शिकवले जातात. त्यांचे विचार जपावे यासाठी अनेकजण प्रयत्न करत असतात. यासाठी अनेकजण वेगवेगळे प्रयोग देखील करत असतात. असाच काहीसा अनोखा प्रयोग छत्रपती शिवाजी महाराजांच्या या मावळ्याने केला आहे.
पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील खामगाव या गावात राहणाऱ्या या तरुणाने महाराजांच्या विचारांचा वारसा असाच पुढे जपण्यासाठी चक्क किल्ल्याच्या आकाराचे घर बांधले आहे. या पठ्ठ्याचे नाव निलेश जगताप असून तो एका शेतकरी कुटुंबातील आहे. तो व्यवसायाने एक पशुवैद्य आहे.
अशा प्रकारचा अनोखा प्रयोग पुण्यात पहिल्यांदाच केला असावा अशी माहिती मिळाली आहे. किल्ल्याची संपूर्ण प्रतिकृती ही नीलेशने तयार केली आहे. त्याने घर बांधताना घराच्या बाहेरील बाजूस ऐतिहासिक किल्ल्यासारखा दिसणारा चिरा जांभा दगड वापरण्यात आला आहे. निलेशने हा दगड खास रत्नागिरी जिल्ह्यातील पावस येथून आणला आहे आणि त्याच्या मदतीने घराच्या चारही बाजूंना बुरुंजाचा आकार दिला आहे.
एवढेच नव्हे तर, मुख्य प्रवेश द्वाराजवळ स्वागत कमान देखील बांधण्यात आली आहे. तसेच घराच्या बाहेरच्या बाजुस कंदीलाच्या आकारांचे दिवे लावण्यात आले आहेत. या घराचा मुख्य दरवाजा अगदी किल्ल्यांवर असतो तसाच मोठा बनवण्यात आला आहे. याशिवाय अंगणात पारंपारिक तुळशी वृंदावन देखील उभारले आहे. या घराची आतील संपूर्ण रचना ही एका पारंपारिक वाड्यासारखी करण्यात आली आहे.
निलेश जगताप यांनी हे घर जवळपास 2577 स्क्वेअर फुट जागेमध्ये बांधले आहे. हे घर बांधण्यासाठी नीलेशला जवळपास 1 कोटी रुपये इतका खर्च आला आहे. तसेच हे घर बांधण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागला आहे. या घरामध्ये देवघर, एक सभागृह, 3 बेडरूम, किचन, एक स्टोअर रुम, बाथरुम अशा प्रकारे एखाद्या पंचतारांकीत हॉटेलप्रमाणे येथे बांधकाम केले असून वस्तूंची मांडणी करण्यात आली आहे. तसेच घराच्या बाहेरील बाजूने बाग देखील फुलवण्यात आली आहे.
निलेश म्हणतो, “मी छत्रपती शिवाजी महाराजांचा फार मोठा भक्त आहे. येणाऱ्या पुढच्या पिढ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा पुढे चालवावा हा या मागचा माझा मुख्य उद्देश आहे. मला लहान पणापासून किल्ले बनवण्याची तसेच किल्ल्यांवर फिरायला जाण्याची आवड होती. त्यामुळे लहानपणापासूनच महाराजांच्या विचारांचा पगडा माझ्यावर आहे. यातूनच त्यांचे विचार पुढच्या अनेक पिढींना समजावेत यासाठी माझ्या डोक्यात अशा प्रकारचे घर बांधण्याची कल्पना आली.”
हे घर सध्या अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा वारसा याद्वारे नक्की जपला जाणारा असा निलेशचा ठाम विश्वास आहे. सध्या या घराची सर्वत्र तुफान चर्चा सुरू आहे. सो’श’ल मी’डि’या’व’र देखील या घराची जोरदार चर्चा सुरू आहे. अनेकांनी शिवप्रेमी नीलेश जगतापचे भरभरून कौतुक केले आहे.