9 वर्षांपूर्वी पतीने सोडले, सफाई कर्मचारी म्हणून काम करत 2 मुलांना सांभाळले, आज बनल्या अधिकारी..
एखादी गोष्ट साध्य करण्याची जिद्द आणि चिकाटी असेल तर कोणतेही ध्येय सहज साध्य होते. आज आपण अशीच एका महिला सफाई कर्मचाऱ्याची कहाणी पाहणार आहोत. राजस्थानच्या रहिवासी असलेल्या आशा कंडारा विवाहित असून त्या आपल्या पतीपासून विभक्त होऊन राहत होत्या.
9 वर्षांपूर्वी त्यांचे पती आशा कंडारा आणि मुलांना सोडून निघून गेले. यानंतर त्यांच्या दोन मुलांची जबाबदारी त्यांच्यावर होती. त्यामुळे उदरनिर्वाहासाठी त्यांना काहितरी काम करणे गरजेचे होते. आशा कंडारा यांनी आपल्या आणि मुलांच्या उदरनिर्वाहासाठी जोधपूर महापालिकेत सफाई कर्मचारी म्हणून नोकरी करण्यास सुरुवात केली.
आपल्या पतीपासून विभक्त झाल्यानंतर काही वर्षांनी, आशा यांनी 2016 मध्ये पदवी शिक्षण पूर्ण केले. या सर्व काळात, त्या आपले वडिल राजेंद्र कंडारा यांच्यासोबत राहत होत्या. यादरम्यान त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होऊन आपल्या मुलांचे स्वतः पालनपोषण करण्याचे त्यांचे नेहमीच स्वप्न होते.
त्यांच्या या प्रवासादरम्यान त्यांना अनेकवेळा लग्नं तुटल्यामुळे, जा’ती’य भे’द’भा’व अशा अनेक समस्यांना समोर जावे लागले होते. पण त्यांनी स्वतःला दुःखात कधीच बुडून जाऊ दिले नाही. याउलट त्यांनी लढण्याचा निर्णय घेतला.
यामध्ये आशा कंडारा यांना त्यांच्या वडिलांनी चांगली साथ दिली. ते सुशिक्षित असल्याने आणि शिक्षणाचे महत्त्व माहीत असल्यामुळे त्यांचे वडील हेच त्यांचे प्रेरणास्थान होते. आशा कंडारा यांना त्यांच्यासारख्या कमी विशेषाधिकारप्राप्त लोकांना मदत करायची आहे. म्हणून त्यांनी प्रशासकीय सेवा परीक्षा देण्याचे ठरवले.
त्यासाठी शिक्षण हे महत्वाचे आहे कारण शिक्षणच संधीचे दार उघडते असे त्या म्हणतात. त्यामुळे त्यांनी आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम घेतले आणि राजस्थान प्रशासकीय सेवा परीक्षा उत्तीर्ण होऊन आशा यांनी समाजात एक नवा आदर्श निर्माण केला आहे. आता यशस्वी झाल्यानंतर त्या उपजिल्हाधिकारी झाल्या आहेत.
दोन मुलांना सांभाळत हे स्थान मिळवणे त्यांच्यासाठी सोपे नव्हते. परंतु, त्यांनी समाज, कुटूंब, वय या कोणत्याच गोष्टींचा विचार न करता आपले स्वप्न पूर्ण करून दाखवले. सध्या सर्वच स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे. सगळीकडून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्या अनेक महिलांसाठी आज एक प्रेरणास्थान ठरल्या आहेत.