वडिलांचा आधार गेल्यावर आईने अ’नाथाश्रमात ठेवले, लग्न झाल्यावर पतीने ही सोडली साथ, जिद्दीच्या जोरावर झाली पोलीस दलात भरती..
आपल्याजवळ जर जिद्द असेल तर कोणतेही संकट आपल्याला यश मिळवण्यापासून रोखू शकत नाही. याचाच प्रत्यय देणारी गोष्ट आज आपण पाहणार आहोत. जळगाव जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या कविता भाऊलाल साळूंखे यांना दोन मोठ्या बहिणी आणि त्यांच्यापेक्षा मोठा एक भाऊ आहे.
कविता या सगळ्यात लहान. त्यांचा मोठा परिवार असल्यामुळे घरी नेहमी बेताचीच परिस्थीती असायची. घरचा उदरनिर्वाह करणारे वडील हे एकटेच होते. ते ही खूप व्य’स’न करायचे. खूप कमी वेळेतच त्यांनी कुटुंबाची साथ सोडली. घराचा आधारच गेल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता.
पुढील आयुष्य कसे जगायचे असा मोठा प्रश्न त्यांच्या आई समोर उभा होता. यावर उपाय म्हणून त्यांच्या आईने त्यांच्या मुलींना अनाथाश्रमात ठेवण्याचा निर्णय घेतला. कविता यांनी अनाथाश्रमामधूनच आपले अकरावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. यादरम्यान त्यांचे संभाजीनगर मधील व्यक्तीशी लग्न लावून देण्यात आले.
लग्नानंतर कविता यांना दोन मुलं झाली. सुखी संसार चालू असताना अचानक कविता यांच्या पतीने त्यांना त्रास द्यायला सुरुवात केली. ‘मला तुझ्यासोबत राहायचे नाही’ असे म्हणून त्यांनी कविता यांना दोन मुलांसोबत सोडून ते निघून गेले.
पती अचानक सोडून गेल्यानंतर कविता यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांना अनेकवेळा आयुष्य सं’प’व’ण्या’चे विचार देखील येऊ लागले. मात्र, मुलांचा विचार करून त्यांनी हिमतीने जगण्याचा निर्णय घेतला.
पुढे त्यांनी पोलिस भरतीची तयारी करण्यास सुरुवात केली. त्या नियमित पहाटे चार ते सहा या वेळात व्यायाम करू लागल्या. एकट्या आपल्या मुलांच्या चांगल्या संगोपनासाठी त्या झटत राहिल्या. त्यांनी रूग्णालयात काम केले. घरी जाऊन महिला रुग्णांची सेवा केली. हे सगळ करत असताना त्यांना दोन वेळचे जेवण देखील नीट मिळत नसे. मुलांना देखील या अडचणींचा सामना करावा लागत होता.
अशा परिस्थितीमध्ये ही खचून न जाता कविता यांनी आपली तयारी चालूच ठेवली होती. अखेर त्या पहिल्याच प्रयत्नात अवघ्या सहा महिन्यांच्या कालावधीमध्ये त्या पोलिस दलात भरती झाल्या. मुलांना चांगले आयुष्य जगता यावे यासाठी त्या नेहमी प्रयत्न करत असतात. आपल्या वाट्याला जे संघर्ष आले ते आपल्या मुलांच्या वाट्याला येऊ नये म्हणून त्या नेहमी झटत असतात.
प्रत्येकाच्या जीवनात संघर्ष असतो मात्र, कविता यांचा संघर्ष कठीण होता. परंतु त्यांनी कधीही हार मानली नाही. जिद्दीने सगळ्या संकटांना सामोरे जात राहिल्या. कविता यांचा हा संघर्षमयी प्रवास खरोखरच एक प्रेरणा देणारा आहे.